Shri Kalyan Swami

Shri Kalyan Swami

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२

सद्गुरू रामाजीबुवा समाधी, श्रीराम मंदिर, पांगरी मठ

 


सद्गुरू रामाजीबुवा समाधी, पांगरी 

श्रीराम मंदिर, पांगरी मठ

 श्रीराम मंदिर, पांगरी मठ, ता. बार्शी, जि. सोलापूर हा सदगुरू समर्थ रामदास स्वामींचे पट्टशिष्य असलेल्या योगिराज श्रीकल्याणस्वामीच्या शिष्यपरंपरेतील रामदासी मठ आहे. गावाच्या पूर्वेकडून आलेल्या नीलकंठा नदीच्या काठावर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रानी महादेवाचे पूजन केले आणि नीलकंठेश्वराची स्थापना करुन आपल्या पदस्पर्शाने हा अवघा भाग पावन केला आहे.

 * सदगुरू रामाजीबुवा

पांगरी मठाचे आद्य मठपती, समर्थ संप्रदायातील सदगुरू रामाजीबुवा हे योगिराज श्रीकल्याणस्वामींचे शिष्य होते. त्यानुसार समर्थ रामदास स्वामी – योगिराज श्रीकल्याणस्वामी – सद्गुरू रामाजीबुवा अशी या मठाची गुरुशिष्य परंपरा आहे. सदगुरू रामाजीबुवा हे अधिकारी सत्पुरुष होते. त्यांनी नजीकच्या दत्तस्थानाजवळ मारुतीरायाची स्थापना केली. मठामध्ये पूर्वाभिमुख मारुतीराय विराजमान असून वर रामपंचायतन प्रतिष्ठापित केलेले आहे. सदगुरू रामाजीबुवांनी पांगरी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये रामभक्ती, बलोपासनेचा प्रसार केला. योगिराज श्रीकल्याणस्वामींच्या शिष्यमंडळामध्ये त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. रामाजीबुवांच्या प्रार्थनेला प्रतिसाद देताना श्रीकल्याणस्वामींच्या डोमगाव येथील समाधीमधून हुंकार निघत असत. रामाजीबुवांचे गुरुबंधू तडवळे मठपती जगन्नाथ तथा जगज्जीवन स्वामी पांगरी मठामध्ये येत असत. त्यावेळी रामाजीबुवांच्या शिष्य परिवाराने त्यांना भक्तिमार्गाच्या प्रसारार्थ अत्यंत कमी कालावधीत ‘जोड दासबोध’ (दोन शिष्यांनी मिळून श्रीमत् दासबोधातील प्रत्येक समास लिहिला.) लिहून अर्पण केला.

पांगरी मठाला श्रीक्षेत्र सज्जनगड येथे होणाऱ्या दासनवमी उत्सवातल्या चांदीच्या काठीच्या (राजदंड) गुरुसेवेचा मानही प्राप्त झाला आहे. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून पांगरी मठाचे मठपती अव्याहतपणे ही सेवा श्रीसमर्थचरणी रुजू करत आहेत. अशा प्रकारची सेवा पांगरीकर रामदासी मंडळींकडून घडणे हे आपल्या गावासाठी अत्यंत गौरवपूर्ण आहे.   

 * रामाजीबुवांची समाधी

मुख्य मंदिरातच मठाचे आद्य मठपती सदगुरू रामाजीबुवांची समाधी आहे. त्यावर शंकराची पिंडी असुन सदगुरुचरणपादुका कोरलेल्या आहेत. समोर दासमारुती विनम्रभावाने उभे असुन बाजुलाच अकरा मारुतींची स्थापना करण्यात आलेली आहे. रामाजीबुवांनंतरच्या दोन सत्पुरुषांची समाधीस्थानेही त्या परिसरातच आहेत. हा सर्व परिसर एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे.

 * मठामध्ये होणारे उत्सव

सध्या मठामध्ये रामनवमी, गुरुपौर्णिमा, रामाजीबुवांची पुण्यतिथी, शनी अमावास्या हे नैमित्तिक सांप्रदायिक उत्सव नित्यनेमाने सुरु आहेत. शनी अमावास्येला मठातील मारुतीरायांना तैलाभिषेक करण्यात येतो. 

 

मठातील मठपतींची नावे व त्यांच्या पुण्यतिथी पुढीलप्रमाणे

 

१)

आद्य मठपती श्री. रामाजीबुवा

श्रावण वद्य त्रयोदशी

२)

श्री. अनंतबुवा

भाद्रपद वद्य द्वादशी

३)

श्री. अनंतबुवा(बापु)

माघ वद्य प्रतिपदा

४)

श्री. रामबुवा

कार्तिक शुद्ध पौर्णिमा

५)

श्री. लखुबुवा

माघ शुक्ल सप्तमी

६)

श्री. अनंतबुवा

 

 

।। रामाजीबुवांची आरती ।।

जय जयजी आरती सदगुरु रामा।

नमिता तवपदी संहरी कामा।।ध्रु।।

 सगुणरुपा गुण शांतीस्वरुपा।

निर्गुणरुपा अनंता अरुपा ।।।। जय जयजी...

तवपदी भाव जया दृढ झाला।

अहं ममतेचा न घाली घाला।।।। जय जयजी...

 पहाता तवपदी मीपण निमाले।

प्रत्ययी राघव साक्षत्व सरले।।।। जय जयजी...


।। सदगुरु पूर्ण दयाळ ।।

रामाजीबावांचे चरणी मन माझे लागो।

दुस्तर हा भवसागर तरेन हे चि दान मागो।।

ज्याचा निश्चय सदगुरुचरणी तनुमन अर्पिले।

पूर्णत्वाचा लाभ चि पाऊनि स्वसूख अनुभविले।।

 कल्याणाचे समाधीतुनिया हुंकार चि निघती।

ऐसा ज्याचा दृढतम निश्चय दीनासि तारिती।।

पांगरीस हे पुर्ण समाधी सुशोभित ही।

दर्शनमात्रे पावन केले जनासी अवघ्या ही।।

अनुष्ठान हे हनुमंताचे केले जयाने।

प्रसन्न होउनि वर मागितला भक्ताकारणे।।

ऐसा सदगुरु पूर्णदयाळ हरीला तारीतो।

आपणा ऐसे करुनी भवबंधाते छेदितो।।

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

सद्गुरू योगिराज श्रीकल्याणस्वामी महाराजकृत रचना

 


|| तो मज आवडतो ||


||ओवाळा ओवाळा सद्गुरू रामदास राणा ||

श्रीजगज्जीवनस्वामीकृत रचना


१) तडवळे मठपती श्रीजगन्नाथ तथा श्रीजगज्जीवनस्वामी यांनी सद्गुरू योगिराज श्रीकल्याणस्वामी महाराज यांचे स्तवनपर रचना केली आहे. ही रचना म्हणून श्री स्वामींच्या समाधीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. कल्याणस्तवनाचा ऑडीओ डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

|| नमस्कार साष्टांग कल्याणस्वामी || 


२) तडवळे मठपती श्रीजगन्नाथ तथा श्रीजगज्जीवनस्वामी यांनी सद्गुरू योगिराज श्रीकल्याणस्वामी महाराज यांच्या दिव्य स्वरूपाचे दर्शन घडविणारी अत्यंत प्रासादिक अशी 'जय जय जी कल्याणा' ही रचना केली आहे. या पदाचा ऑडीओ डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

|| जय जय जी कल्याणा ||


या दोन्ही रचनांचे गायन श्री. वादिराज विनायक लिमये यांनी केले आहे. 

श्रीसमर्थ आणि मंत्रविज्ञान

समर्थ रामदास स्वामी हे योगेश्वर होते. त्यांना मंत्रयोग पूर्णत: अवगत होता. मंत्रविज्ञानाच्या सहाय्याने आजारांची चिकित्सा आणि उपचार केले जातात. याची प्रचिती देणारा एक प्रसंग 

सातारा जिल्ह्यातील चाफळ येथे श्रीसमर्थांचे असताना एक दिवस अचानक जवळच असलेल्या तारळे खोऱ्यातील सर्व शिष्याना थंडीतापाच्या साथीने(शैत्य) ग्रासले. हे श्रीकल्याणस्वामींनी श्रीसमर्थांना कळविताच त्यांनी एक मंत्र लिहून श्रीकल्याणस्वामींकरवी शिष्यांना पाठविला. तो मंत्र श्रीकल्याणस्वामींनी सर्वांना ऐकविताच त्यांचा रोग बरा झाला असा उल्लेख श्रीदासविश्रामधाम या प्राचीन ग्रंथात आढळतो. सदर मंत्र शोधून काढून धुळ्याच्या समर्थहृदय श्री. शंकर श्रीकृष्ण देवांनी शके १८७१ मध्ये श्रीसमर्थअवतार या ग्रंथात १२५ व्या पानावर छापला आहे. तो मंत्र खालीलप्रमाणे.

 इंद्रनीळरंग राम शाम धाम योगिया ।

नाम पूर्णकाम सार फार भवरोगीयां ।।

गुरुवार, २३ जुलै, २०२०

योगिराज श्रीकल्याणस्वामी स्थापित श्रीमारुती




।। श्रीराम समर्थ।। 

श्रीसमर्थशिष्य योगिराज श्रीकल्याणस्वामी महाराज यांनी ३०० वर्षांपूर्वी बारामती येथील ग्रामजोशी श्री. लोणकर कुटुंबीयांकडे आपल्या हाताच्या नखांनी मारुती कोरून त्याची स्वहस्ते स्थापना केली. त्या वेळेपासून श्रीकल्याणस्वामींनी बारामती येथील पेठेत असलेल्या श्रीराम मंदिरातील रामनवमी उत्सवाची एक प्रथा घालून दिली. त्यानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्यास श्रींची पालखी वाजतगाजत या मारुतीला भेट व उत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी निघते. पालखी लोणकर वाड्यात आल्यावर मारुतीस रुद्राभिषेक होतो. आरती नंतर सर्वांना खिरापत व पन्हे प्रसाद म्हणून देण्याची पद्धत आहे. यानंतर पालखी पुन्हा राम मंदिरात येते व श्रीराम नवरात्रोत्सवास आरंभ होतो. हे श्रीराम मंदिर म्हणजेच श्रीकल्याणस्वामी यांचे शिष्य श्री रामजीदादा यांचे समाधी मंदिर होय. यांचा मूळ मठ बारामतीच्या दक्षिणेस असून, तो "तीन वेस मारुती" किंवा "मळदचा मारुती" या नावे प्रसिद्ध आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजेच रामनवमी दिवशी श्रींचा छबिना या मारुतीस उत्सवास आणण्यास निघतो. मठात पोहोचल्यावर तेथे आरती होते व छबिना पुन्हा राम मंदिराकडे निघतो. सकाळी ११.५० ते ११. ५५ च्या दरम्यान छबिना राम मंदिराच्या आवरात पोहोचतो व गाभाऱ्यात येतो व बरोबर १२.०० वाजता श्रीराम जन्माचा गुलाल उधळला जातो. यानंतर दशमीस सायंकाळी रामराय पुन्हा मूळ मठाकडे मारुतीरायास पोहोचवण्यासाठी निघतात व मठात पोहोचल्यावर मानाच्या सवाया व जोहार गायला जातो. त्यानंतर आरती होऊन सर्वांना लाह्या प्रसाद म्हणून दिल्या जातात व छबिना  पुन्हा मंदिराकडे निघतो. मंदिरात आल्यावर मानाचे विडे दिले जातात व उत्सवाची सांगता होते. 

या दहा दिवसांच्या उत्सवाची सुरुवात कल्याणस्वामी यांनी ३०० वर्षांपूर्वी घालून दिली जी अजूनही अखंडपणे लोणकर यांचाकडील मारुतीच्या पूजनाने सुरु होत आहे. या मारुतीचा नुकताच जीर्णोद्धारीत मंदिरात पुनर्प्राणप्रतीष्ठापना सोहळा पार पडला.

बुधवार, २५ मार्च, २०२०

॥कल्याणशिला॥

कल्याणशिला॥




योगिराज श्रीकल्याण स्वामी डोमगाव परिसरामध्ये  आल्यानंतर वर्षातील प्रत्येकी चार महिने डोमगाव, परंडा आणि डोंजा या तीन गावांमध्ये वास्तव्यास असत.

डोंजा येथील श्री रेणुकादेवीचे मंदिर हे श्रीकल्याणस्वामींचे वास्तव्यस्थान आहे. आजही या मंदिरात 'कल्याणस्वामींची शिळा' या नावाने एक शिळा आहे. या शिळेवर श्रीकल्याणस्वामी आसनस्थ होत असत.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥